गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काही ना काही वादामुळे चर्चा झडत आहेत. नुकताच साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद शमला असतानाच आता ‘फोन टॅपिंग’चा नवा राजकीय धुरळा महाराष्ट्राच्या राजकारणात उडाला आहे. ‘फडणवीस सरकार विरोधी पक्षातले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे फोन टॅप करत होते’, असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच, ‘आप के फोन टॅप हो रहे है’, अशी माहिती मला भाजपच्याच एका नेत्याने दिली होती’, असा देखील दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, विद्यमान सरकारला चौकशीचं आव्हानच दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फोन टॅपिंग प्रकरणात झालेल्या आरोपांवर तीव्र नापसंती व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे. ‘विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांनी हा आरोप केला आहे, त्यांची विश्वसनीयता सगळ्यांना माहीत आहे. ज्या कुठल्या यंत्रणेमार्फत राज्य सरकारला चौकशी करायची आहे, त्या यंत्रणेमार्फत राज्य सरकारने चौकशी करावी. आमच्या सरकारमध्ये तेव्हा शिवसेनेचे मंत्रीदेखील गृहराज्यमंत्री होते. सरकारने चौकशी करावी आणि तो अहवाल जनतेसमोर ठेवावा. हवं तर इस्त्रायलला जाऊन चौकशी करा’, असं फडणवीस यांनी सुनावलं आहे.
सविस्तर वाचा – फोन टॅपिंगची माहिती भाजपच्या नेत्यानेच दिली; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप?
दरम्यान, या आरोपांनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच इतरही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील तथ्य समोर आणण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.