मुंबई पोलिसांकडून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तासांहून अधिक वेळापासून चौकशी सुरू होती. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांची टीम दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोहचली. दुपारी २ वाजेपर्यंत ही चौकशी चालली. महाराष्ट्रातील पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवरच ही चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली होती.
या प्रकरणी मुंबई पोलीस हे फडणवीसांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी सागर बंगल्यावर आले होते. मुंबई पोलिसांनी एसआयटीचा डेटा लीक झाल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील माहितीनंतर पाचवेळा या डेटासाठी पत्रव्यवहार केला होता. पण कोणतेही उत्तर न आल्याने अखेर मुंबई पोलिसांनी जबाब नोंदणीसाठी फडणवीसांना सायबर पोलीस ठाण्यात बोलावल्याची नोटीस पाठवली होती. पण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता सायबर पोलिसांची टीमच आज सागर बंगल्यावर दाखल झाली. याठिकाणी दोन तास फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला.
मुंबई पोलिसांचे दोन अधिकारी या चौकशीसाठी आज दुपारी १२ वाजता सागर बंगल्यावर हजर झाले. डीसीपी हेमराज सिंह राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या उपस्थितीत ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सायबर पोलिसांकडून याआधी २०२१ मध्ये टेलिग्राफ अॅक्ट आणि ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानेच देवेंद्र फडणवीसांकडे माहिती मागणवणारी प्रश्नावली पाठवण्यात आली होती. माहिती पाठवण्याबाबतचे पत्र फडणवीस यांनी दिले होते. पण माहिती प्राप्त न झाल्याने अखेर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची नोटीस फडणवीस यांना पाठवली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठीची सूचना सुरूवातीला देण्यात आली. पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयामुळे मुंबई पोलिसांची टीमच फडणवीसांच्या सागर बंगला येथे हजर झाली.
As the entire conspiracy by MVA against the BJP leaders got exposed in #MaharashtraAssembly recently, they are sending me notices.
𝙸 𝚠𝚒𝚕𝚕 𝚋𝚎 𝚝𝚑𝚎𝚛𝚎 𝚊𝚝 𝙱𝙺𝙲 𝙲𝚢𝚋𝚎𝚛 𝙿𝚘𝚕𝚒𝚌𝚎 𝚂𝚝𝚊𝚝𝚒𝚘𝚗 𝚝𝚘𝚖𝚘𝚛𝚛𝚘𝚠, 𝟷𝟹𝚝𝚑 𝙼𝚊𝚛𝚌𝚑 𝟸𝟶𝟸𝟸, 𝚊𝚝 𝟷𝟷 𝚊𝚖. pic.twitter.com/E6mUy49LoC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
सागर बंगल्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांची हजेरी आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंह, कालीदास कोळमकर, प्रसाद लाड, नितेश राणे, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर हे प्रमुख नेते सध्या सागर बंगल्यावर उपस्थित आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणी फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर सायबर गुन्ह्यांच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती. या प्रकरणातच फडणवीस यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सायबर पोलिसांकडून सुरू आहे. दुपारी १२ वाजल्यापासून फडणवीसांची चौकशी सुरू आहे.