BDD चे काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू – फडणवीस

BDD चे काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू – फडणवीस

मुंबईत बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भाजप सत्तेत असताना झालेल्या दिरंगाईवर निशाणा साधण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणत्याही कसर सोडली नाही. पण भाजपवर झालेल्या टिप्पणीचा समाचार विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. बीडीडी प्रकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारकडून कशा प्रकारे विलंब झाला याचा खुलासा देंवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण त्याचवेळी मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार आहे याचा आनंदही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आज रविवारी पार पडलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीतील नेत्यांपैकी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोघांनीही भाजपच्या काळातील भूमीपूजनावर टीका केली. पाच वर्षे झाली नारळ फोडून पण प्रकल्पाचे काम जैसे थे राहिले अशी टीका दोन्ही नेत्यांकडून झाली. या टिकेचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर निशाणा साधला आहे. दीड वर्षांचा विलंब करून हे काम पुन्हा सुरू होत आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा हा आमच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आला होता. सर्व परवानग्या घेऊन त्याच्या निविदा काढून कार्यादेशही आमच्या काळातच देण्यात आले. तसेच या प्रकल्पाचे भूमिपूजनही आमच्या सरकारच्या काळात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. पण हेच काम आता दीड वर्षांचा विलंब होऊन सुरू होत आहे. त्याचे भूमिपूजन झाल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुढे जाणार आहे याचा आनंद असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने याआधी फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या काळात झालेल्या भूमीपूजन समारंभावर टीका केली होती. याआधीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला होता. पण त्यानंतर काय झाले माहिती नाही अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केली. माझ्या वरळीत बीडीडी प्रकल्पाचा तीन वर्षे आधीच नारळ फुटला, पण पुढे काही झाले ते माहित नाही. ज्यावेळी या प्रकल्पाच्या निमित्ताने कंत्राटदारांसोबत बैठका झाल्या त्यावेळी खुद्द कंत्राटदारांनीच या प्रकल्पाला संथगती आल्याचे कबुल केले. या प्रकल्पात काहीच होत नसल्याने आम्हाला कंटाळा असल्याची प्रतिक्रिया दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तीन ते चार वर्षे उलटूनही काहीच होत नसल्याने प्रकल्पाच्या गतीवर कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली होती.


 

First Published on: August 1, 2021 7:35 PM
Exit mobile version