महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तसेच लाभार्थी नसलेल्या इयत्ता पहिली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अंतर्गत ५ कोटी ७३ लाख ३० हजार २६९ पाठ्यपुस्तके आणि बाजारातील विक्री अंतर्गत ३ कोटी ८७ लाख ५ हजार पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा – राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
दहावीच्या पुस्तक वाटपाला सुरूवात
पाठ्यपुस्तक मंडळाच्या मुंबई येथील गोरेगाव या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तकांच्या वितरणास आज शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. दहावी या महत्त्वाच्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील सर्व भांडारांमधून विक्रीला सुरूवात झाली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या भांडारात तसेच पुस्तक विक्रेत्यांकडे पाठ्यपुस्तके खरेदीसाठी गर्दी होऊ नये याकरता टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांच्याही पाठ्यपुस्तकांची विक्री सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून समग्र शिक्षा अंतर्गत व विक्री करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घेतला. तसेच त्यासंदर्भात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी पाठयपुस्तक मंडळाचे संचालक विवेक गोसावी, गोरेगाव विभागीय भांडार व्यवस्थापक अजय यादव, भांडारातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.