फडणवीस- अजित पवारांचे सरकार पाहून धक्का बसला

फडणवीस- अजित पवारांचे सरकार पाहून धक्का बसला

पंकजा मुंडे

गोपीनाथ गडावर पक्षाविरोधात नाराजी उघडपणे नाराजी व्यक्त करणार्‍या पंकजा मुंडेंची अजूनही नाराजी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या सरकारमुळे आनंद झाला नव्हता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे हा माझ्यासाठी एक धक्का होता असे पंकजा यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्याचबरोबर एखाद्या पदासाठी पंकजा मुंडे दबावतंत्राचा वापर करत असल्याच्या आरोपावरही बोलताना, आपल्याला पुन्हा एकदा शुन्यातून सुरुवात करायची असल्यानेच आपण कोअर कमिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा म्हणाल्या. आपण पक्षवाढीसाठी संघर्ष यात्रा काढली. शेकडो सभा घेतल्या. पण आता पुन्हा एकदा स्वत:ची ताकद जोखायची असल्याने शून्यातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक आमदार झाले याचा आनंद आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यावेळी माजी मंत्री लिहू नका असे मी सांगितले होते. माझ्या ट्विटर हँडलवर कधी कमळ नव्हते, त्यामुळे कमळ त्यावेळीच नव्हते असे म्हणणे चूक आहे. त्यावेळी माझ्या मनात खदखद नव्हती, आता आपण आमदारही नाहीत. त्यामुळे पुढे काय करायचे हे ठरवायचे होते त्यासाठी ती पोस्ट लिहिली होती, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: December 15, 2019 5:15 AM
Exit mobile version