कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेली टास्क फोर्सची बैठक संपली. कोरोना निर्बंधांबाबत या बैठीकमध्ये निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत कोरोनाच्या पंचसूत्राबद्दल आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी याकरिता आवाहन केले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीला संबोधित केलं. ही बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय कॅबिनेटमध्ये चर्चेला गेला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही मार्गदर्शन केलं. कोरोनाची पंचसूत्री अंमलात आणावी. महाराष्ट्रात व्हॅक्सिनेशन ९५ टक्क्यांच्या आसपास झालं आहे. तसेच महाराष्ट्रात BF.7 चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जे चार रुग्ण भारतात आढळून आले आहेत. त्यात गुजरातमध्ये दोन आणि ओडीसात दोन, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले.

लहान मुलं आणि ६० वर्षांवरील वृद्ध मंडळींनी मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा. गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्स ठेवावं. त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही. येत्या सोमवारपासून महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची २ टक्के थर्मल टेस्टींग करण्यात येणार आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेने खबरदारी घ्यावी, यासाठी निवेदन करत आहे. पुढील आठवड्यात केंद्राकडून काही मार्गदर्शन तत्वे आल्यास पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला मार्गदर्शन करतील. त्यानंतर आरोग्य विभाग योग्य तो निर्णय घेईल, असं सावंत म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात जरी नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात आले असले तरी केंद्राकडून मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा : चीनमधला नवा व्हेरियंट महाराष्ट्रात आढळला नाही; केंद्राकडून सतर्कतेचे आदेश, आरोग्यमंत्र्यांची माहिती


 

First Published on: December 22, 2022 8:10 PM
Exit mobile version