नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम

नववी आणि अकरावीचा निकाल प्रथम सत्र परीक्षेच्या आधारे लावण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. मात्र निकाल कशा पद्धतीने तयार करायचा याबाबत शिक्षकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने तातडीने परिपत्रक जारी करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षक आणि शाळांतून व्यक्त होत आहे. इयत्ता नववीच्या परीक्षादेखील होणार नसून सरासरी गुणदान करून निकाल जाहीर करायचा आहे. मात्र त्यासाठी पद्धत काय आणि निकाल कसा तयार करायचा असा पेच शाळांपुढे निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढून निकाल काढण्यासंदर्भातील सूचना दिल्या जातील असे म्हटले आहे. मात्र ते कधी काढणार असा सवाल शाळांकडून होत आहे. नाशिक येथील शिक्षण उपसंचालकांनी यासंदर्भातील सूचना शाळांना दिल्या आहेत. मात्र अद्याप मुंबईत काहीच कार्यवाही सुरू नाही अशीही तक्रार शिक्षकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना सरसकट बारावीला प्रवेश द्या

अकरावीच्या संदर्भातही सूचना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना करीत सर्व विद्यार्थ्यांना सरसकट बारावीला प्रवेश द्या अशी मागणी होत आहे. यासंदर्भात राज्य स्तरावर तातडीने शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढावे असा सूर आता शाळा महाविद्यालयांकडून होत आहे.

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आकारिक, संकलित मूल्यमापनाद्वारे भारांशाप्रमाणे होते. दि. २० ऑगस्ट २०१० रोजीच्या शासन आदेशानुसार सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून या पद्धतीने मूल्यमापनाची कार्यवाही दरवर्षी केली जाते. त्यामुळे या वर्गाचा निकाल काढणे सोपे आहे. यासंदर्भातही अद्याप थेट परिपत्रक नसल्याने गोंधळ आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात केंद्राकडून राज्य सरकारला मदत मिळेना


 

First Published on: April 15, 2020 11:28 PM
Exit mobile version