संपूर्ण भारतदेशामध्ये कोरोना पुन्हा आपली मान वर काढू लागला आहे. अशातच महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपतकालीन बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले की, आता कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे , रायगड, पालघर या जिल्ह्यात मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीची तसेच लहान मुलांची देखील काळजी घ्या.
लोकल ट्रेनमध्ये मास्क अनिवार्य
या बैठकीत कोरोनाचे वाढते रूग्ण पाहता मुंबईची लाइफलाइन म्हणजेच लोकल ट्रेनमध्ये प्रवाश्यांना मास्क घालणं अनिवार्य असल्याचे सांगितले आहेत. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात जवळपास २५ हजार रूग्ण अॅक्टिव असून यांपैकी ९५ टक्के रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. तसेच ५ टक्के रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
मात्र रुग्णालयातील रूग्णांची संख्या कमी असली तरी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ऑक्सीजनवर एक टक्के तर आयसीयूमध्ये अर्धा टक्के रुग्ण आहेत. व्हेंटीलेटरवर २५ रुग्ण आहेत. यावेळी नाशिक, पुणे, अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी देखील कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.
बैठकी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुंबईमध्ये दररोज २० हजारांपेक्षा जास्त चाचणी करण्यात येत असून सध्या कोरोना रूग्णांची संख्या १३ हजार ४०० ऐवढी आहे.