Maharashtra Rain: जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर

Maharashtra Rain: जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे २०१९ च्या महापूरादरम्यान ज्यापद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले होते आज त्याचपद्धतीने जयंतराव पाटील पूरग्रस्त भागात ऑन ग्राऊंड उतरले आहेत. जयंत पाटील आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सकाळी वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरीकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे. मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

स्थलांतरीत नागरिकांची होणार अँटीजन टेस्ट

सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतरीतांची अँटीजन टेस्टही केली जात आहे. पूराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पूरस्थिती नियंत्रणासाठी प्रयत्न

कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे. कोल्हापूरात पाणीपातळी धोकादायक पातळीच्यावर अशीही माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

First Published on: July 24, 2021 5:07 PM
Exit mobile version