उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू राजकारण करत असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली आहे. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून वागायला लागले आहेत. काम करायला लागले आहेत, बोलायला लागले आहेत. आत्ता उध्दव ठाकरे यांचं अयोध्येत शरयू नदीच्या काठावर जाणं होतं, ते निवडणूका डोळयासमोर ठेवूनच होतं आणि राज ठाकरे यांचंही हिंदी भाषिकांसमोर जाणं आणि संवाद साधणं म्हणजे निवडणूकांचीच तयारी आहे, असा आरोपही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

हेही वाचा – गोंधळात पुरवण्या मागण्या मांडणे लोकशाहीच्या विरोधात – जयंत पाटील

‘२० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर करता मग कर्ज कशासाठी?’

सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणूनच सरकार २० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्यांवर खर्च करायला तयार आहे. मग, सरकार ५०० कोटी रुपये एखादया संस्थानाकडे मागते हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता किती कमी झाली आहे हे यावरुन दिसून येते, अशी जोरदार टिका आमदार जयंत पाटील यांनी केला. शिर्डी संस्थानाकडून राज्यसरकारने ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यावर मिडिया प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारच्या या धोरणावर सडकून टिका केली. एखादया संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. सरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना हिच मंडळी सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह करायची. आम्ही ११ हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र ४-५ हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत असेही आमदार जयंत पाटील म्हणाले. शिर्डीच्या संस्थानाकडून सरकारनं कर्ज घेतलं. या कर्जाची गरज का, तर निळवंडी धरणाचं काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या लिक्विडिटीचा क्रंच आलेला आहे. सरकार अडचणीत आहे. सरकारनं सर्व मार्ग अनुसरल्यानंतर शेवटी कुणीच कर्ज देत नसल्याचं लक्षात आल्यावर आपल्या ताब्यातील आणि जिथे संचालक मंडळ नेमलेले आहे त्याठिकाणच्या शिर्डी संस्थानाकडून ५०० कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे त्यामुळे राज्य सरकारची पत कमी झाली आहे हे लक्षात येते असा गंभीर आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.


हेही वाचा – वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करतंय – जयंत पाटील

First Published on: December 3, 2018 4:14 PM
Exit mobile version