तर जनतेच्या दरबारात जाण्याची वेळ आली नसती

तर जनतेच्या दरबारात जाण्याची वेळ आली नसती

खडसेंचा फडणवीसांवर आरोप

 माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी वारंवार माझी भूमिका पक्षाला सांगितली होती. मात्र, माझे पक्षात कुणी ऐकले नसल्याने नाईलाजास्तव मला जनतेच्या दरबारात जावे लागल्याची खंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता व्यक्त करत आहेत. ही भूमिका त्यांनी आधीच घेतली असती तर आज मला जनतेसमोर अशा पद्धतीने जावे लागले नसते, या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले.

खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप केल्यानंतर त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर माझ्यामुळे नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला, असे फडणवीस म्हणाले. याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या या प्रतिक्रियेवर बोलताना खडसे म्हटले की, भोसरीची जमीन ही एमआयडीसीची नव्हती. आजही ती मूळ मालकाच्या नावावर आहे. मी महसूलमंत्री राहिल्याने मला त्यातील कायदेशीर ज्ञान आहे. जी जमीन खरेदी करण्यात आली ती माझ्या पत्नीच्या नावाने खरेदी केली आहे. तीदेखीलही नियमानुसार शुल्क भरून खरेदी केली. त्यात जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. इतरांवर आरोप होताच त्यांना लगेचच क्लिन चिट देण्यात आल्या. मात्र, माझ्यावर आरोप सिद्ध झाले नव्हते तर मला एकट्याला क्लिन चिट का दिली नाही. विधानसभेतसुद्धा शेवटच्या भाषणात मी सांगितले होते की, मला आरोप घेऊन बाहेर जायचे नाही. मात्र, त्यावेळीही मला विश्वासात घेतले गेले नसल्याची खंतही खडसेंनी व्यक्त केली.

First Published on: September 11, 2020 6:32 PM
Exit mobile version