Lok Sabha 2024 : उबाठाची 100 टक्के काँग्रेस झालीय; एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

Lok Sabha 2024 : उबाठाची 100 टक्के काँग्रेस झालीय; एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

कोल्हापूर : बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार, हे या राज्याचे दुर्दैव आहे. ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय. आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटतेय, हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास त्यांची जीभ कचरू लागली असून उबाठाची 100 टक्के काँग्रेस झालीय, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोल्हापूरातील तपोवन मैदानात आयोजित महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray)

उबाठा परिवार काँगेसला मतदान करणार हे पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सभेला लोटलेला प्रचंड जनसागर पाहून मुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित आहे. निवडणुकीनंतर धनुष्यबाण येईल आणि कोल्हापूरातून पंजा कायमचा हद्दपार होईल. कोल्हापूरकर यावेळी धनुष्यबाणाचा खटका ओढून विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 हेही वाचा – Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपा, एनडीए 2-0 ने पुढे; निकालाआधीच मोदींकडून विश्वास व्यक्त

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरातील पुराची कटु प्रसंगाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, पुरात एक गर्भवती महिला अडकली होती. त्यावेळी आपण कार्यकर्त्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन गर्भवती महिलेची सुटका केली. तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो. कोल्हापुरातल्या या अस्मानी संकटात सतत 12 दिवस लोकांना मदत करत होतो, असे सांगत असतानाच एकनाथ शिदेंनी मोदींबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्रनितीसाठी झाला आहे. आईचे दु:ख विसरून निस्वार्थ सेवा करणारा पंतप्रधान देशाला हवा आहे. आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान नको, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

‘येड पेरलं आणि खुळं उगवलं’ 

काँग्रेस काय चाललंय तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस, पडू दे त्यांचा पाऊस. मोदींकडे नुसते आश्वासनांचे पेढे नाहीत तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे. ‘येड पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी राहुल गांधींची अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्रातील जनता मोदींसोबत आहे. या देशात मोदींची गॅरंटी चालते. महाराष्ट्रात प्रत्येक घरात मोदी आणि मना मनात मोदी आहेत. मोदींच्या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्र झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही एकनाथ शिंदें यांनी दिला.

हेही वाचा – Politics : शशिकांत शिदेंना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास…; शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले 

Edited By – Rohit Patil

First Published on: April 27, 2024 9:40 PM
Exit mobile version