मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे भाजपाचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले, पण उत्तर प्रदेश-बिहारात त्याचा फटका बसेल. अशोक चव्हाण, अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फायदा होणार नाही. अजित पवार यांच्या गटास लोकसभेची एकही जागा मिळणार नाही. बारामतीत सुनेत्रा पवार आणि रायगडात सुनील तटकरे यांचा दारुण पराभव होत आहे, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कमी पडले की, पुढचा सूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लावतात. स्वतःचा कंडू शमविण्यासाठी महाराष्ट्रावरील आकसापोटी मोदी-शहांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची शकले केली, कुटुंबे फोडली. माजी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पुत्रप्रेम आणि कन्याप्रेम नडले. त्यामुळेच त्यांचे पक्ष फुटले, असे विधान अमित शहा करतात ते कशाच्या आधारावर? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरात केला आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : …तेच मोदी मंगळसूत्रावर प्रवचने देतात, संजय राऊतांचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्वही लोकसभा निवडणुकीनंतर राहील काय? हा प्रश्न आहे. शिंदे यांच्या वाट्याला 16 जागा आल्या. त्यांच्या पाच खासदारांना भाजपाने उमेदवारी नाकारली. खरी शिवसेना म्हणणाऱ्यांची ही अवस्था असल्याचे सांगून संजय राऊत म्हणतात की, ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा ठोकला आणि शिंदे काहीच करू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत भाजपाने हे करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे राहिले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मतदानाचा पहिला टप्पा मोदी यांच्या हातातून निसटला आणि दुसऱ्या टप्प्यातही त्यांचा बेताल प्रचार कामी येईल, अशी चिन्हे नाहीत. देशात बदल होत आहे आणि महाराष्ट्रही त्या बदलात सहभागी होताना दिसत आहे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणीचे मतदान झाले. या दोन्ही टप्प्यांत भाजप पिछाडीवर आहे. मोदी यांच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.