घरदेश-विदेशLok Sabha 2024 : ...तेच मोदी मंगळसूत्रावर प्रवचने देतात, संजय राऊतांचा हल्लाबोल

Lok Sabha 2024 : …तेच मोदी मंगळसूत्रावर प्रवचने देतात, संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांत भाजप पिछाडीवर आहे. मोदी यांच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदी यांचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना दिसतात, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

“केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप केले जाईल. महिलांची मंगळसूत्रे हिसकावून घेतली जातील,” असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीस प्रचारात हिंदू-मुसलमान याशिवाय दुसरे मुद्दे नसावेत आणि ऐन प्रचारात मतांसाठी धार्मिक प्रचार करावा लागतो, हे त्यांच्या मानसिक स्थितीचे प्रदर्शन आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोठेही संपत्तीच्या फेरवाटपाचा, मंगळसूत्राचा उल्लेख नाही. तरीही मोदी बिनधास्त खोटे बोलत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील ‘रोखठोक’ सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

देशात बदल होत आहे

मतदानाचा पहिला टप्पा मोदी यांच्या हातातून निसटला आणि दुसऱ्या टप्प्यातही त्यांचा बेताल प्रचार कामी येईल, अशी चिन्हे नाहीत. देशात बदल होत आहे आणि महाराष्ट्रही त्या बदलात सहभागी होताना दिसत आहे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणीचे मतदान झाले. या दोन्ही टप्प्यांत भाजप पिछाडीवर आहे. मोदी यांच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारासाठी सर्वाधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या. मोदी यांच्या सभांचा कोठेच प्रभाव पडला नाही अमित शहांच्या सभांची दखल मतदारांनी घेतली नाही. “मोदी यांची लाट राहिलेली नाही. आता आपला आपणच संघर्ष करावा लागेल,” असे मत अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केले, ते खरेच आहे. मोदी-शहांचे नाव कोणी घेतले तरी लोक चिडतात, असे वातावरण आज महाराष्ट्रात आहे. नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित आहे आणि त्या भयातून ते विरोधकांच्या बाबतीत बेताल विधाने करीत आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -