Maharashtra Lockdown: जनतेच्या तोंडाला पाने पुसली; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

Maharashtra Lockdown: जनतेच्या तोंडाला पाने पुसली; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधून कोरोना परिस्थितीचा आढावा दिला. राज्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.’

‘राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे,’ असे पाटील म्हणाले.

‘रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत,’ असे पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – Maharashtra Lockdown: ठाकरे सरकार ७ कोटी लाभार्थ्यांना देणार मोफत धान्य


 

First Published on: April 13, 2021 10:44 PM
Exit mobile version