Lockdown तरीही कोकणचो आंबो मिळणार देशभर!

Lockdown तरीही कोकणचो आंबो मिळणार देशभर!

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असला तरी लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे, धान्य दुकाने काही वेळासाठी उघडी ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता एप्रिल, मे महिना सुरू झाला की लोकांना वेध लागतात ते कोकणातील हापूस आंब्याचे. यंदा आंबा खायला मिळणार की नाही अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण आता तुमचा लाडका हापूस आंबा नेहमीप्रमाणेच तुमच्यापर्यंत पोहचणार आहे. कोकणातील आंब्यांना देशभर पोहचवण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागांत पाठवण्याकरीता करता येणार आहे. ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे.

असं आहे ट्रेनचं टाईम टेबल

२० एप्रिल म्हणजेच आज ही ट्रेन ओखा वरून रवाना झाली आहे. २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन रत्नागिरीला, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवलीला, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगावला, तर ९ वाजून १० मिनिटांनी उडुपी येथे पोहोचणार आहे. तर २४ एप्रिलला ही ट्रेन तिरुवअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उडुपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.

व्यापारी,  उत्पादक,  आंबा बागायतदार या ट्रेन मधून आपल्या मालाची ने आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात या करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.


हे ही वाचा – …तर लॉकडाऊनमध्येही तुम्हाला मिळू शकते दारू


 

First Published on: April 21, 2020 8:39 AM
Exit mobile version