तळीये दरड प्रवण गावांच्या यादीतच नव्हते – अजित पवार

तळीये दरड प्रवण गावांच्या यादीतच नव्हते – अजित पवार

तळीये गावाचा समावेश हा कधीच दरड कोसळणाऱ्या अशा दरड प्रवण गावांच्या यादीत नव्हता. त्यामुळे तळीये गावावर आलेले संकट हे महाडमध्ये आलेल्या अतिपुरामुळेच आले. त्याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी होते की मदत कार्य पोहचवण्यासाठीही अनेक अडचणी येत होत्या. प्रत्यक्षात हेलिकॉप्टरमध्ये मदत पोहचवतानाही हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठीही जागा नव्हती अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पुण्यात आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आल्यानेच याठिकाणी बचावकार्य पोहचवण्यात अनेक अडचणी आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

त्याठिकाणचे स्थानिक आमदार यांनी कोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने त्याठिकाणी रस्ता करून दिला. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेतेही त्याच रस्त्याने जाऊ शकले अशी माहिती अजितदादा यांनी दिली. हेलिकॉप्टरने मदत पोहचवताना अनेक तास हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठी जागा शोधत होते. पण बऱ्याच ठिकाणी मात्र दलदल असल्यानेच त्याठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वर्षात महाडच्या तळीये गावाचे नाव कधीच दरड प्रवण असलेल्या गावांच्या यादीत नव्हते. पण पहिल्यांदाच असे घडले की याठिकाणी महाडमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृष्टीमुळेच याठिकाणी परिस्थिती बदलत गेली. मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानेच याठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली.

चीन, जपान यासारख्या देशातही इतकी प्रगती झाल्यानंतर पूराच्या पाण्याच्या परिस्थितीने सगळेच बिघडले. इतक्या वर्षात घडले नाही तशी परिस्थिती या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली. महाराष्ट्रातही अनेक भागात अनपेक्षित अशा पावसामुळेच परिस्थिती बिघडत गेली. महाराष्ट्रात कोयनेच्या नवजा गावात २४ तासांमध्येच १६ टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची भर पडली. याठिकाणी अवघ्या २४ तासांमध्ये ३० इंच इतका पाऊस पडला. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अशी घटना यापूर्वी कधीही याठिकाणी घडलेली नव्हती.

अन् क्षणात केंद्राने महाराष्ट्राला मदतीचा ओघ सुरू केला

महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीसाठीची माहिती देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यानंतर केंद्राने तातडीने मदत पाठवायला सुरूवात केली. काल सकाळीच केंद्रासोबत बोलणे झाले होते. मी स्वतः राजनाथ सिंह यांच्याशी बोललो होतो. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता केंद्राकडून लगेचच मदतीचा ओघ सुरू करण्यात आला. एनडीआरएफ, भारतीय लष्कर, नौदल तसेच एअरफोर्स अशी सर्व प्रकारची मदत केंद्राने तत्काळ देऊ केल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला.


 

First Published on: July 24, 2021 2:04 PM
Exit mobile version