Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरून राज्यात राजकारण तापलं, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच

Maharashtra Security and Police Alert : भोंग्यांवरून राज्यात राजकारण तापलं, परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच

भोंग्यावरून राज्यात वातावरण तापलं असून परराज्यांतून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नरज असणार आहे. राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या लोकांवर पोलिसांची नजर असणार आहे. दंगल घडविण्याचा कट असल्याने यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमकही सज्ज आहे. तसेच भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावू, यावर मनसे ठाम असल्याने नेत्यांचीही धरपकड सुरू आहे.

मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास आंदोलन सुरूच राहील, अशी धमकी राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

मनसेचे नेते पुढील आठवडयात अयोध्येला आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. येत्या ५ जूनला राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा असणार आहेत. भोंग्याविरुद्ध आंदोलनानंतर आता अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु झाली आहे. या दौरावेळी शरयू नदीच्या काठी, मनसे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणाहून मनसैनिक अयोध्यामध्ये दाखल होणार आहेत.

उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यालयात स्टँडबायवर ठेवले आहेत. दरम्यान, मनसेच्या आंदोलनासंदर्भात आतापर्यंत शहरात एकूण ७ गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा : एखाद्या लढाईत एखादा सेनापती नसला तर कोणी लढाई हरत नाही – वसंत मोरे


 

First Published on: May 6, 2022 11:52 AM
Exit mobile version