महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज रंगशारदा येथे पार पडला. यावेळी त्यांनी स्वाभिमान स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा केली. तसेच आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे त्यांनी जाहीर केले आहे. ही घोषणा केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणा दिल्या. तसेच “स्वाभिमान पक्ष कोणत्याही युती किंवा आघाडीत सामील होणार नाही. युतीत माझ्या नावाची काहींना कावीळ झाली आहे. माझी भीती काहींना वाटत आहे. मला सांभाळू शकले नाहीत तर घाबरता कशाला? आणि दुसरीकडे गेलोय तरी तिथेही राहू देत नाही”, असेही राणे यावेळी म्हणाले.
पुर्ण भाषण ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
दहशतवादी हल्ला होऊनही युतीची चर्चा
“पुलवामाची घटना घडल्यानंतर सर्व देश स्तब्ध झाला होता. मात्र तरिही काही लोकांनी युतीसाठी बैठका घेतल्या. या बैठका कशासाठी झाल्या तर सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. महाराष्ट्रात आघाड्या आणि युत्या होत आहेत. त्याचे कारण यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार नाहीत.”, अशी टीका राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे नळावरच्या बायकांप्रमाणे भांडले
आम्ही सत्तेला लाथ मारू, सत्तेतून बाहेर पडू, अशी कालपरवा पर्यंत टीका करणारे आज कोणत्या आधारावर युतीची चर्चा करत आहेत. नळावर ज्याप्रमाणे बायका भांडत असतात, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी चार वर्ष भांडण केले आणि आज सत्तेसाठी पुन्हा एकत्र येण्याची भाषा करत आहेत.