५ सप्टेंबरला मुंबईत वाहतूक कोंडी? मराठा संघटनांचा ‘गाडी मार्च’

५ सप्टेंबरला मुंबईत वाहतूक कोंडी? मराठा संघटनांचा ‘गाडी मार्च’

मराठा आरक्षण

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनसामान्यांच्या रोजनिशी व्यवहारामध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येत आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. आपल्या मागण्यांसाठी मराठा समन्वयक संघटनांनी अनेकदा रास्ता रोको, रेल रोको, महाराष्ट्र बंद, मुंबई बंद असे मार्ग स्विकारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सामान्यांचं आणि विशेष करून नेहमीच धावत्या राहणाऱ्या राजधानी मुंबईचं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. अखेर मराठा समन्वयक संघटनांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आरक्षणासंदर्भातील ठराव मंजूर करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, त्यातही निश्चित कालमर्यादा नसल्यामुळे आता या मागणीसाठी मराठा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नक्की कधी विशेष अधिवेशन घेणार याची तारीख सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत जाहीर करावी, अन्यथा ४ सप्टेंबरला मुंबईत ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

मुंबई होणार ‘पॅक’

आजपर्यंत मराठा संघटनांनी रास्ता रोको, रेल रोको, महाराष्ट्र बंद, मुंबई बंद, बाईक रॅली अशा स्वरूपात आंदोलन आणि शक्तीप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. यंदा मात्र ‘गाडी मार्च’ काढण्याचा नवा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सरकारने अधिवेशनाची निश्चित तारीख जाहीर न केल्यास ५ सप्टेंबरला मुंबईत ‘गाडी मार्च’ काढणार असल्याचं बुधवारी कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे. ४ सप्टेंबरला हा गाडी मार्च कोल्हापुरातल्या दसरा चौकातून सुरु होऊन मुंबईत मंत्रालयापर्यंत येऊन थांबेल, असे यावेळी ठरवण्यात आले आहे. तसेच, यावेळी मंत्रालयाला घेराव घालणे, स्टॉक एक्स्चेंजचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न करणे अशा स्वरुपात आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील श्रीमंत शाहू महाराज यांची गाडी या मोर्चामध्ये सर्वात पुढे असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी ही माहिती दिली.


हेही वाचा मराठा तरूणांवरील गुन्हे मागे घ्या | अन्यथा १ डिसेंबरपासून गनिमी कावा


पश्चिम महाराष्ट्रातील संघटना एकवटल्या

बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटनांची बैठक कोल्हापुरात झाली. यावेळी समाजाच्या मागण्यांचा सरकारने विचार करावा अशी आग्रही मागणी संघटनांकडून करण्यात आली. त्यासाठी कोल्हापुरातूनच ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याद्वारे मुंबईपुरीची वाहतूक कोंडी करण्याची योजना असल्याचं समोर येत आहे.


महत्त्वाचे – नाशिकमध्ये मराठा आदोलकांमध्ये हाणामारी


 

First Published on: August 23, 2018 11:16 AM
Exit mobile version