मी व मोदी एकत्र राहिल्यावर पुन्हा सत्ता : रामदास आठवले

मी व मोदी एकत्र राहिल्यावर पुन्हा सत्ता : रामदास आठवले

रामदास आठवले

आपण म्हणजे आपला पक्ष व नरेंद्र मोदी एकत्र आलो, त्यामुळे केंद्रात पाच वर्षे सत्ता राहिली. आगामी काळातही आम्ही एकत्र राहिल्यास पुन्हा केंद्रात सरकार भाजप व मित्र पक्षांचेच असेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. कळस येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे होते.

कळस कृषी प्रदर्शनाबद्दल त्यांनी छत्रपती युवा मंडळाला कौतुकाचे शब्द ऐकवताना वेगवेगळे ३०० स्टॉल, यांत्रिकी मशिनरी, शेतीविषयक माल व जनावरांचे प्रदर्शन हे प्रेक्षणीय असल्याचे सांगितले. केंद्राकडून व राज्याकडून या प्रदर्शनासाठी योग्य तो निधी मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करू. त्यासाठी विहित नमुन्यात प्रकल्प आराखडा मंडळाने करून पाठवावा. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बाधित शेतकर्‍यांना राज्य सरकारने मदत केली असण्याची शक्यता व्यक्त करून यातून उद्ध्वस्त शेतकर्‍यांना मदत मिळण्याकामी आपणही हातभार लावू अशी हमी दिली.

कृषी प्रदर्शनामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान, शेतकर्‍यांचे शेतीतील नवीन प्रयोग यावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नदीजोड प्रकल्पाची देशभर अंमलबजावणी केली गेली असती तर आज अतिवृष्टीच्या समस्येला देशाला सामोरे जावे लागले नसते. आरपीआयचे राज्य सचिव विजय वाकचौरे यांच्या सहकार्याचा गौरवाने उल्लेख करीत तीन वेळेला लोकसभेत, एक वेळेला राज्यसभेत जाण्याची आपल्याला संधी मिळाली. पाच वर्षे केंद्रात मंत्री राहिलो व यापुढेही आपण राहू असेदेखील त्यांनी सांगितले.

कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांना सांगून आपण निधी मिळवून देऊ असे सांगताना शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे जसे ऐकता तसे आमचे हे ऐकावे असे मिश्किल टिप्पणी केली. आपला पक्ष पैसेवाला नाही पण आमच्या पक्षातील कार्यकर्ते राजाभाऊ कापसे हे बरे (सधन) आहे. असे सांगून ते या प्रदर्शनाला ५० हजार रुपये देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शिवाय आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत राज्य सरकार १६ टक्के व केंद्र सरकार दहा टक्के आरक्षण देणार आहे आणि आणि मराठा समाज उभा राहण्यासाठी सर्वच बाजूने मदत होणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शुभम घुले या युवकाने गीर गायीचे दुग्ध उत्पादन घेऊन इतरही उपपदार्थ उत्पादने घेतली. सातव्या मैलावर असलेल्या त्यांच्या निमाई डेअरीला आठवले यांनी भेट दिली. तेव्हा पत्रकारांनी त्यांना छेडले असता दिल्ली विधानसभेमध्ये आम्हाला भाजपाने जागा वाटपात सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे तेथे मैत्रीपूर्ण सात-आठ जागांवर आम्ही लढत असल्याचे सांगितले. त्यांना काही वेळापूर्वीच अकोले येथील त्यांच्या भाषणाची आठवण करून दिली. तेव्हा मात्र त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले.

First Published on: January 25, 2020 6:03 AM
Exit mobile version