निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी केंद्राने फक्त २६८ कोटींची मदत केली; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी केंद्राने फक्त २६८ कोटींची मदत केली; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

पूरग्रस्तांना प्रति कुटुंब १० हजार रोख तर ५ हजार रुपयांचे धान्य - ठाकरे सरकारचा निर्णय

निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला १ हजार ४० कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्र शासनाने फक्त २६८ कोटी रूपयांची मदत केली तर राज्य शासनाने ७८० कोटी रूपयांची मदत आपदग्रस्तांना केली. आता तौक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांसाठीही आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छिमारांना आर्थिक मदतीचे निकष बदलून मिळावे यासाठी विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मच्छीमारांच्या नुकसानीसंदर्भात बँकासोबत देखील चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. वादळग्रस्त मच्छिमारांना सरकारकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही संबधित विभागाला देण्यात आले आहेत. यापूर्वी निसर्ग चक्रीवादळावेळी शासनाने जुन्या निर्णयांमध्ये आमुलाग्र बदल करून घेतल्यामुळे आपदग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ केली आहे. मच्छीमारांच्या बाबतीत सरकार सकारात्मक असून त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

निकष बदलून वादळग्रस्तांना मदत – सुभाष देसाई

मच्छिमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्यांवर सरकार सकारात्मक कार्यवाही करील. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही सरकारने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याचपद्धतीने तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमार यांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने यावेळी मच्छिमार बांधवांच्या तोक्ते वादळातील झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. वाढवून मिळणारी मदत रोख रक्कम अथवा एखाद्या योजनेमार्फत मिळावी, मासळी सुकविणारे छोटे मत्स्यव्यवासायिक यांनाही मदत करावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, उपसचिव श्रीनिवास शास्त्री, राजेंद्र जाधव, कोकणचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे, महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीचे सरचिटणीस किरण कोळी, ज्योती मेहेर व अन्य उपस्थित होते.

 

First Published on: June 17, 2021 6:20 PM
Exit mobile version