लाल किल्ल्यावरील धुडगुसात भाजप कार्यकर्ते – शरद पवार

लाल किल्ल्यावरील धुडगुसात भाजप कार्यकर्ते – शरद पवार

शरद पवार यांचा गंभीर आरोप

केंद्राच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याची सत्ताधारी भाजपने पध्दतशीर मोहीमच हाती घेतली होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सोलापूरच्या दौर्‍यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचा उपद्व्याप आणि गर्दीत धुडगूस घालणारे सगळेच सत्ताधारी भाजपचेच कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांच्या माहितीचा हवाला देत शेतकरी आंदोलनाला बदनाम करून हे आंदोलन गुंडाळण्याचा कुटील डाव सत्ताधारी पक्षाने रचला होता, असेही पवार म्हणाले.

शरद पवार आज सोलापूर दौर्‍यावर आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधार्‍यांवर गंभीर आरोप केला. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडगूस घातला गेला त्यातून शेतकर्‍यांच्या आंदोलनाविरोधात षड्यंत्र रचले गेले होते, असे सांगताना पवार म्हणाले, आम्ही जरा खोलात जाऊन माहिती घेतली त्यावेळी आमच्या असे लक्षात आले की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारे शेतकरी नव्हते, त्यात सत्ताधारी गटाचेच काही लोक होते. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारमधील शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे.

या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी मंत्री, खासदार, आमदार बदनामी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांनी याआधी आंदोलक शेतकर्‍यांना खलिस्तानी, नक्षलवादी ठरवले. बदनामीचे हे प्रयत्न फसल्यावर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणे आणि रॅलीत धुडगूस घालणारे सगळेच सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते होते, असा आरोप पवार यांनी केला. शेतमालाच्या खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच शेतकर्‍यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय. मात्र, प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोप पवार यांनी केला.

First Published on: February 14, 2021 4:00 AM
Exit mobile version