एखाद्या मुद्द्यावर मनसेनं खळ्ळ-खट्याक् करणं काही नवीन नाही. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय औरंगाबादमधील एका घटनेमुळे आला आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिदांसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोल्हापुरात बोलताना केलेल्या वक्तव्यावर औरंगाबादमधील एका डॉक्टरांनी त्यांच्या फेसबुकवर टीका करणारी पोस्ट टाकली होती. मात्र, या पोस्टवरून मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी संबंधित डॉक्टरांना मारहाण करत पोलिसांच्या हवाली केलं. दरम्यान, यासंदर्भात कोणताही गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला नाही. औरंगाबादच्या वैजापूरमधील हे डॉक्टर असून शत्रुघ्न थोरात पाटील असं त्यांचं नाव असल्याचं समजतंय. राज ठाकरेंबद्दल त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
…ते म्हणत होते ‘मला माफ करा’!
शत्रुघ्न पाटील वैजापूरमधल्याच एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये सेवा पुरवतात. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर काही आक्षेपार्ह भाषेत पोस्ट टाकल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट संबंधित हॉस्पिटल गाठून डॉ. शत्रुघ्न पाटील यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांच्या अंगावर शाई देखील फेकली. या संपूर्ण प्रकारादरम्यान शत्रुघ्न पाटील जमलेल्या कार्यकर्त्यांची माफी देखील मागत होते. मात्र, त्यातून जमावाचं समाधान झालं नाही आणि त्यांनी डॉ. पाटील यांना थेट पोलिस स्टेशनमध्ये नेलं. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
सविस्तर वाचा – पुलवामातील शहीद हे राजकीय बळी – राज ठाकरे
काय म्हणाले होते राज ठाकरे?
कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी ‘पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी आहेत आणि हळूहळू सत्य बाहेर येईल. अजित डोवाल यांची चौकशी करा’, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून बरीच चर्चा देखील सुरू झाली होती. ‘निवडणुकांच्या आधी असं काहीतरी घडवायचं आणि लोकांचं मूळ मुद्द्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवायचं, असं वाटलंच होतं’, असं देखील राज ठाकरे म्हणाले होते.