संकटं आली पण आम्ही चारित्र्य गहाण ठेवलेलं नाही, गिरणी कामगार संघटनेनं ठणकावलं

संकटं आली पण आम्ही चारित्र्य गहाण ठेवलेलं नाही, गिरणी कामगार संघटनेनं ठणकावलं

महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या प्रोमोनंतर गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रविण घाग यांनी माय महानगरला मुलाखत दिली. यात त्यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करत चित्रपटावर बंदीची मागणी केली. गिरणी कामगाराच्या वाट्याला दु:ख आली, त्याच्यावर आर्थिक संकटं आलीत पण त्याने कधी त्याचं चरित्र आणि चारित्र्य गहाण ठेवलेलं नाही, असं प्रविण घाग यांनी म्हटलं.

गिरणी कामगारांचा १९८२ चा संप मी अनुभवलेला आहे, मी त्या संपात सहभागी होतो. गिरणी कामगारांचं सगळं काही संपलं होतं. तेव्हा गिरणी कामगारांच्या महिलांनी मुलांनी रस्त्यावर येऊन काम केलं. भांडीकुंडी धुतली, शहरातून उपनगरात गेले. परंतु ज्या पद्धतीने महेश मांजरेकरने हिडीसपद्धतीचं चित्रिकरण केलं आहे, तशा पद्धतीचं त्याकाळी महिलांनी केलेलं नाही. जी दृश्य दाखवली आहेत त्यामागे त्यांची काय भूमिका आहे माहिती नाही. महेश मांजरेकर मराठी दिग्दर्शक आहेत, त्यांनी असं दाखवणं योग्य नाही. गिरणी कामगार हा संस्कारी आहे. ही संस्कृती मुंबईलाच नाही तर संपूर्ण जगाला दिली आहे. कसं रहायचं, कष्ट करायचं जीवन जगायचं…त्याच्यापरिनं तो जगला. त्याच्या वाट्याला दु:ख आली असतील, त्याच्यावर आर्थिक संकटं आलीत पण त्याने कधी त्याचं चरित्र आणि चारित्र्य गहाण ठेवलेलं नाही. त्याला कलंक लावू दिलेला नाही, असं प्रविण घाग यांनी ठणकावून सांगितलं.

जे काही प्रोमोमध्ये दाखवलं आहे ते अतिशय चिड आणणारी गोष्ट आहे. आम्ही त्याचा निषेध करतोय. मराठी माणूस त्याच्या मेहनतीवर, कष्टावर जगतोय. तो श्रम करुन पोट भरतोय. आज गिरणी कामगारांची मुलं शिकलीत आज ती मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. आयटी क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात आहेत. प्रगती करताना वाईट असं काही केलं नाही. ज्या पद्धतीनं चित्रपटात दाखवलं आहे ते अतिशय किळसवाणं आहे. याविरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत, असं प्रविण घाग यांनी सांगितलं.

मांजरेकरने केलेलं विकृतीकरण थांबायला हवं; गिरणी कामगारांच्या मुलांची मागणी

मनोज मोघे जो गिरणी कामगारांचा मुलगा आहे, त्यांनी माय महानगरशी बोलताना महेश मांजरेकरने जे मराठी माणसांचं विकृतीकरण केलेलं आहे ते थांबायला हवं, तो चित्रपटच पाडायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. महेश मांजरेकरांनी आधी जो चित्रपट काढला होता लालबाग परळ, त्यामध्ये त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलांबद्दल जे काही दाखवलं होतं तेही आक्षेपार्ह होतं. ते बघितल्यावर गिरणी कामगारांच्या मनामध्ये अस्वस्था आहे

मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. आम्ही ती १०-१५ वर्ष कशी काढली आम्हाला माहिती आहे. आम्ही तीन भाऊ होतो, आम्ही चांगलं शिक्षण घेण्याचं ठरवलं. आमची आई कामाला जायला लागली. वडील कामाला जायला लागले. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. आम्ही पार्ट टाईम काम करुन शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झालो, आज आम्ही चांगल्या कंपनीत कामाला आहोत. तेव्हा गावातून नातेवाईकांना बोलवून त्यांचं करियर घडवायचे, आपली ही संस्कृती आहे. पण हे सर्व सोडून नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण केलं जात आहे. मराठी माणसाला अशापद्धतीने प्रोजेक्ट केलं जात आहे, याचा मला प्रचंड राग आहे, असं मोघे म्हणाले.

उद्या मराठी माणसाच्या पुढच्या पीढीने जर तो चित्रपट पाहिला तर तो बाबा आपल्याकडे असं होत होतं असं विचारेल. तो काय विचार करणार आहे? आपली मराठी संस्कृती, चाळ संस्कृती आहे, एकमेकांना आधार देणारी संस्कृती आहे. मात्र ज्या पद्धतीने त्यात दाखवलं आहे, त्यावरुन जर उद्या मुलांनी विचारलं की हे असं होत होतं मग…हे किती भयानक आहे. महेश मांजरेकरने जे मराठी माणसांचं विकृतीकरण केलेलं आहे ते थांबायला हवं. तो चित्रपटच पाडायला हवा अशी मागणी मनोज मोघे यांनी केली.


हेही वाचा – महेश मांजरेकरांचे गिरणी कामगारांच्या स्त्रियांचे हिडीस चित्रीकरण, ‘नाय वरणभात लोन्चा’ प्रोमोवर राज्यभरातून संताप


 

First Published on: January 13, 2022 8:36 PM
Exit mobile version