महाविकास आघाडी सरकारला कुठलीही अडचण नाही, मात्र पक्षातील बंडखोरांवर कारवाई होणार – नाना पटोले

महाविकास आघाडी सरकारला कुठलीही अडचण नाही, मात्र पक्षातील बंडखोरांवर कारवाई होणार – नाना पटोले

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठा भूंकप होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र अचानक शिवसेनेच्या गोटातून नगरविकास मंत्री आणि शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय भूकंप घडवून आणला आहे. एकीकडे भाजप विजयाचा जल्लोष साजरा करत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारला धक्का देण्याची तयारी केली आहे. एकूणच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालींमुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदेच्या याच बंडखोरीवरून आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या पक्षातील आमदारांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचं पटोलेंनी स्पष्ट केले आहे. (nana patole clearly stated about eknath shind and slams bjp Vidhan Parishad Election 2022)

भाजपचा देशातील राजकारणाचा हा अध्याय

नाना पटोले म्हणाले की, भाजपची देशात राजनिती चालली आहे, भाजपचा देशातील राजकारणाचा हा अध्याय आहे. भाजप केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करत हे लपलेलं नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून पुन्हा सत्ता असे हे चक्र फिरवण्याचा प्रयत्न आणि असत्याचा मार्ग भाजपने स्वीकारला आहे. यात सत्याचा विजय होईल, हे थोडावेळचं आहे. ऊन-सावली हा जसा निसर्गाचा नियम आहे. तसंच महाराष्ट्रावर आलेलं जे ऊन आहे त्याचं सावलीमध्ये रुपांतर होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांचा बहुमताचा आकडा अजून दूर

शिवसेना आमदारांच्या नाराजी नाट्यावर बोलताना पटोले म्हणाले की, ही घटना रात्रीची आहे. मुंबईला गेल्यावर काँग्रेस नेत्यांची एक बैठक बोलावली आहे, बैठक घेत त्यामध्ये सर्व प्रकारची भूमिका घेतली जाईल, बहुमताचा आकडा पूर्ण करायला दिवसा स्वप्न पाहणाऱ्या लोकांना आकडा अजून दूर आहे. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला कोणतीही अडचण आहे असं मी मानत नाही. असा दावा नाना पटोलेंनी केला आहे.

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर कारवाईचा इशारा 

काँग्रेसमध्ये झालेल्या मतदानाची बंडखोरी झाली त्याचं आत्मपरीक्षण करुन त्यापद्धतीने हाय कमांडला याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. तसेच पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली जाईल असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. दरम्यान आज दिल्ली वैगरे काही नाही. सर्वच आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे, यासाठी मी मुंबईत जात आहे, असेही पटोले यांनी सांगितले आहे.


ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये


First Published on: June 21, 2022 11:44 AM
Exit mobile version