नाणारची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल विधानपरिषदेत गाजली

नाणारची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल विधानपरिषदेत गाजली

नाणार प्रकल्पातील परप्रांतीय खरेदीदारांची नावे

रत्नागिरीच्या किनारपट्टीवर होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पावरून सध्या रणकंदन सुरू आहे. राज्यातही आणि विधानभवनातही! नाणार प्रकल्पाला असलेला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी विधानपरिषदेमध्ये विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ‘आपलं महानगर’ने शुक्रवारच्या अंकामध्ये नाणार प्रकल्पाची जमीन खरेदी करणाऱ्या परप्रांतीयांच्या नावांची यादीच थेट छापून आणल्यामुळे याचे तीव्र पडसाद शुक्रवारी विधानपरिषदेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी ‘आपलं महानगर’ वृत्तपत्राने गौप्यस्फोट करत प्रकाशित केलेली ही सर्व नावं सभागृहासमोर ठेऊन सरकारला खडे बोल सुनावले. यासाठी त्यांनी ‘आपलं महानगर’च्या शोध पत्रकारितेचेही आभार मानले. मात्र, आता ही सर्व नावं समोर आल्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे. नाणार प्रकल्पासाठीच्या जमीन खरेदीदारांमध्ये सर्व नावं ही परप्रांतीयांचीच असल्याचं ‘आपलं महानगर’ने घेतलेल्या धांडोळ्यामध्ये समोर आलं आहे.

नाणार प्रकल्पाची ‘आपलं महानगर’ने केलेली पोलखोल

नाणारच्या प्रकल्पाची झाली पोलखोल!

‘मुख्यमंत्री साहेब, ही घ्या नावे!’ या मथाळ्याखाली ‘आपलं महानगर’ने नाणार प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कुणी लाटल्या याची पोलखोल केली आहे. या तेल शुद्धीकरण कारखान्यामुळे कशा प्रकारे स्थानिकांच्या जमिनी लाटून धनदांडगे अजूनच श्रीमंत होणार असून स्थानिक मच्छिमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे, याचं वास्तवच या वृत्तामध्ये उघड करुन दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे इथल्या जमिनी खरेदी करणाऱ्यांमध्ये काही परप्रांतीय आणि काही स्थानिक असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. प्रकल्प रत्नागिरीत येण्याच्या २ वर्ष आधीच कशा प्रकारे या परप्रांतीय खरेदीदारांना त्याबद्दल माहिती होती आणि त्यांनी जमिनी खरेदी केल्या, याचीही सत्यता या वृत्तामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आली आहे.

नाणार प्रकल्पातील गरीब शेतकऱ्यांची अडीच हजार एकर जमीन परप्रांतीय लोकांनी खरेदी केली आहे. ‘आपलं महानगर’  दैनिकाने या सर्व लोकांची यादी आज प्रसिद्ध केली आहे. अमराठी लोक जमीन खरेदी करुन सरकारला प्रकल्प उभारण्यासाठी समंती देत आहेत आणि याच लोकांची समंती दाखवून प्रकल्प रेटला जात आहे. ‘आपलं महानगर’ने शोध पत्रकारिता केल्याबद्दल मी त्यांचे कोकणवासीयांतर्फे आभार मानतो.

किरण पावसकर, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

नाणारचे धगधगते वास्तव

रत्नागिरीतील नाणार येथे प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्याला कोकणातून विरोध वाढत आहे. नाणार तेलशुद्धीकरण कारखान्यासाठी १५ हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ हजार २०० कुटुंब विस्थापित होणार आहेत. यामध्ये ८ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे आंबा काजूसह स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. शिवाय कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. आशियाखंडातील सर्वात मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी १४ गावातील ज्या १९० जणांनी जमिन खरेदी केली, त्या सर्वांची नावे ‘आपलं महानगर’ने दिली.

नाणारला वाढता विरोध, राजकारणी मात्र संभ्रमात

नाणार प्रकल्प हद्दपार करण्यासाठी कोकणातून लढा उभारला जात आहे. कोकणच्या जनतेने पावसाळी अधिवेशनामध्ये नागपुरामध्ये जात आपला विरोध दर्शवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रकल्प लादणार नाही’ अशी ग्वाही दिली. मात्र ‘प्रकल्प रद्द होत नाही तोवर माघार घेणार नाही’ अशी भूमिका कोकणच्या जनतेने घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नारायण राणे यांच्यासह सर्वांनी कोकणच्या जनतेला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपकडून केंद्रीय स्तरावर प्रकल्पासाठी करार सुरूच आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेमध्ये असून देखील काहीच का करत नाही? शिवसेनेचा विरोध लटका आहे का? असा सवाल आता सर्व स्तरातून विचारला जात आहे.


ही एक्सक्लुझिव्ह बातमी वाचण्यासाठी क्लिक करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब; ही घ्या नाणारची जमीन खरेदी करणार्‍यांची नावे

 

First Published on: July 20, 2018 2:54 PM
Exit mobile version