जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींचा आज बिगूल वाजणार

जिल्ह्यात १९४ ग्रामपंचायतींचा आज बिगूल वाजणार

नाशिक : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची अधिसूचना मंगळवारी (दि.१३) जाहीर करण्यात येणार आहे. तहसिलदार स्तरावर ही सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात यापूर्वीच ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा फड एैन रंगात आलेली असताना नव्याने चार तालूक्यांमध्ये निवडणूकीचा रणसंग्रामाला प्रारंभ होत असल्याने सार्‍यांच्याच नजरा त्याकडे लागल्या आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यातील ८२ तालूक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणार्‍या १ हजार १६६ ग्राम पंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या चार तालूक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासर्व ठिकाणी तहसिलदार मंगळवारी (दि.१३) निवडणूकीची अधिसूचना घोषित करतील. तर २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. २८ तारखेला दाखल अर्जांची छाननी, ३० तारखेला दुपारी ३ पर्यंत माघारी व त्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर १३ ऑक्टोबरला मतदान व १४ ला मतमोजणी आणि १९ ऑक्टोबरला निकालीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. गावा-गावांमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

अशा होतील निवडणुका
First Published on: September 13, 2022 1:06 PM
Exit mobile version