जिल्ह्यात आजही पाच हजार कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. ही संख्या ४६ हजारांवरुन ५ हजारांवर आली असली तरीही ती कमी झाली असे नाही. कारण, ऑस्ट्रेलियात केवळ १६९ रूग्ण आढळल्यानंतरही त्यांनी लॉकडाऊन केले. त्यामुळे आपल्यालाही काळजी घ्यावी लागेल, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत शासनानं काही निकषांच्या आधारे पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली. त्यानुसार दर शुक्रवारी प्रत्येक जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी दर जाहीर केला जात आहे. शहरात रूग्णसंख्या कमी दिसत असली तरीही ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या कायम आहे. ग्रामीण हद्द शहराला लागून असल्याने त्या भागातील लोक शहरात येण्याने संसर्ग वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जातेय.