उमेदवार मुलाखतीची संस्कृती नसलेल्या शिवसेनेकडून राज्यातील इच्छुकांना तोंडी मुलाखतींसाठी ‘मातोश्री’वर पाचारण करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांच्या मुलाखती येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणार्या भाजपप्रमाणेच शिवसेनाही सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या भावना जाणून घेणार आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांतील नेते बोलत असून त्यादृष्टीने जागा वाटपाचे सूत्र ठरवले जात आहे. कोणत्या जागा लढवायच्या हे निश्चित होण्यापूर्वीच भाजपने नाशिकमध्ये सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, अशा पद्धतीने उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची संस्कृती शिवसेना पक्षात नसल्याचे सांगत उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी ‘मातोश्री’चा आदेश शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य असल्याचे नाशिकमध्ये म्हटले होते. त्यांच्या उद्घोषणेला एक आठवडा होत नाही, तोच शिवसेनेनी सर्व इच्छुकांना ‘मातोश्री’वर बोलावून घेतले आहे.
हे देखील वाचा – नाशिकमध्ये शिवसेना इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात
मंगळवार (दि.10) पासून इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या पध्दतीने त्यांचे विभाजन करण्यात आले असून, दिग्गज नेत्यांची फळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
सात नेत्यांचे शिष्टमंडळ : भुसे राखीव यादीत
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या पाच जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखतींसाठी शिवाजीराव पाटील, अरविंद नेरकर, खासदार हेमंत पाटील, डॉ. दीपक सावंत, किशोरी पेडणेकर, अमोल कीर्तीकर, वरुण सरदेसाई या सात नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच नाशिकचे भुमिपूत्र तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना राखीव नेत्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.