इगतपुरीतील या प्रकल्पामुळे शेतकरी पुन्हा संकटात

इगतपुरीतील या प्रकल्पामुळे शेतकरी पुन्हा संकटात

इगतपुरी : तालुक्यातील घोडेवाडी, टाकेद बु, टाकेद खु, बारशिंगवे, खेड, आधारवड या ठिकाणी होणारा ऊर्ध्व कडवा प्रकल्प भूसंपादन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन गव्हांडे, नांदुर मध्यमेश्वर प्रकल्प अधिकारी संगीता जगताप, सहायक अभियंता केतन पवार, इगतपुरी भूमी अभिलेख अभियंता विष्णू भाबड, शिरस्तेदार मिलिंद जगताप यांनी या ठिकाणी येऊन जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी या मोजणीला तीव्र विरोध केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या जमिनीची जबरदस्तीने मोजणी केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांनी घेतली.

अखेर घोरपडेवाडी येथे शासनाचे अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रांत अधिकारी यांनी सांगितले की, ऊर्ध्व कडवा प्रकल्पात ज्यांच्या जमीनी संपादित होतील, त्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबादला मिळेल, बुडीत शेतकर्‍यांना पुनर्वसन लाभ क्षेत्रात जमिनीचे प्लॉट देण्याची योजना असून आज फक्त जमिनीची मोजणी होऊ द्या अशी मागणी या बैठकीत प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी केली. या प्रकल्पाला सन २००२ मध्ये मान्यता मिळाली असून भविष्यात या प्रकल्पामुळे स्थानिकांना या पाण्याचा उपयोग होईल,अशी माहिती नांदुर मध्यमेश्वर प्रकल्प अधिकारी संगीता जगताप यांनी दिली. मात्र, स्थानिक शेतकर्‍यांनी जमीन मोजणी करण्यास तीव्र विरोध केला. दरम्यान ऊर्ध्व कडवा प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी व इतर शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित होणार असल्याने स्थानिक शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी कुठलेही साधन राहणार नाही. त्यामुळे येथील प्रकल्प बाधित शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तर या बैठकीत बाळु लक्ष्मण गायकवाड या शेतकर्‍याने तीव्र विरोध दर्शवला असून बळजबरीने भूसंपादन केल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा ईशारा दिला आहे.

या बैठकीस माजी आयुक्त चंद्रकांत खाडे, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, संपर्कप्रमुख रामदास गायकर यांसह बाळासाहेब घोरपडे, शंकर चोथवे, नामदेव लहामगे, अशोक वाजे, पोपट लहामगे, विष्णु घोरपडे, तुकाराम लहामगे, युवराज परदेशी, मारूती ढमाळे, देवराम घोरपडे, सचिन भारस्कर, मुरलीधर घोरपडे, लहानु घोरपडे, भगवान कदम, भिमा घोरपडे, आनंदा घोरपडे, आनाजी घोरपडे आदी प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते.

First Published on: October 8, 2021 10:45 AM
Exit mobile version