गोदा प्रदूषण करणार्‍यांवर पोलिसांचा ‘वॉच’

गोदा प्रदूषण करणार्‍यांवर पोलिसांचा ‘वॉच’

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हरितकुंभ संकल्पना तयार करण्यात आली आहे. गोदावरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेसह पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे. पुढील दोन महिने प्रदूषण करणार्‍यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. परिमंडळ एकमधील चार पोलीस अधिकारी आणि २९ कर्मचारी नदीकिनारी गस्त घालणार आहेत.

शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर व आडगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोदावरी नदीचे पात्र आहे. रामकुंड आणि गोदावरी नदी परिसरात प्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ मध्येच दिले आहेत. महापालिका, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, एमआयडीसीसह पोलिसांना सुद्धा यासाठी न्यायालयाने वेळोवेळी सूचना केल्या. महापालिकेने रामकुंडावर सुरक्षारक्षक तैनात केले होते. मात्र, काही महिन्यांतच वेतनाचा वाद उपस्थित झाला आणि हे सुरक्षारक्षक माघारी फिरले. गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर आदी पोलिस स्टेशनमार्फत गोदा प्रदूषण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाली. या कारवाईचा अहवालसुद्धा वेळोवेळी न्यायालयाला सादर झाला. याप्रकरणी आता परिमंडळ एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नदीपात्रात कपडे, भांडी, वाहने, जनावरे धुणे, कचरा टाकून प्रदूषण करणार्‍यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस ठाणेनिहाय पथके नेमण्यात आली आहेत.

First Published on: April 21, 2019 11:15 PM
Exit mobile version