घोटी योजनेस पाणी देण्यास टाळाटाळ

घोटी योजनेस पाणी देण्यास टाळाटाळ

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण

इगतपुरी शहराला भावली धरणातून पाणी पुरवठा योजना मंजुरीनंतरही केवळ पाणी परवानगी देण्याला मुद्दाम अडचणी आणल्या जात असल्याने आमदार निर्मला गावित संतापल्या आहेत. योजनेसाठी औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून पाणी उचलण्याची परवानगी प्रलंबित आहे. वर्षभरापासून पाटबंधारे महामंडळ योजनेसाठी पाणी परवानगी देण्यास अनेक अडचणी आणीत आहे. पाण्यासाठी जमिनी देणार्‍या स्थानिक भूमिपुत्रांना पाणी देणार्‍या योजनेला पाणी परवानगी न दिल्यास संपूर्ण तालुका रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा आमदार निर्मला गावित यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणार्‍या घोटी शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. योजनेची सर्वांगीण प्रक्रिया पूर्ण झालेली असून औरंगाबादच्या पाटबंधारे महामंडळाकडे भावली धरणातून पाणी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरापासून आमदार निर्मला गावित ह्यांच्याकडून ह्या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र महामंडळाकडून पाणी परवानगी देण्यास विविध अडचणी आणल्या जात आहेत. ह्या योजनेसाठी ३५००० दलघमी पैकी फक्त ३० दलघमी पाणी लागणार आहे. दुष्काळग्रस्त असणार्‍या औरंगाबादच्या गंगापूर, वैजापूर आणि ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील २७ गावांच्या पाणी योजनांना मात्र पाणी परवानग्या दिल्या जात आहेत. पाण्यापासून फक्त इगतपुरीला वंचित ठेवण्याचे षडयंत्र राज्य शासन करीत असल्याचा आमदार गावित यांचा आरोप आहे. पाणी योजनेला पाणी परवानगी देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

First Published on: April 3, 2019 12:09 AM
Exit mobile version