कळवण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात बुधवार (दि.१६) पासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद मिळात आहे. यात मेडिकलवगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कळवण शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोना ची साखळी तूटण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शहरातील मेडिकल सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय रविवारपर्यंत पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यापासून शहर व तालुक्यात विविध गावात रुग्णसंख्या वाढत असल्याने मंगळवारी पार पडलेल्या संयुक्त बैठकीत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.
विनाकारण बाहेर पडू नये प्रशासनाच्या वतीने आवाहन
नागरिकांनी मास्क वापरावा व विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. दरम्यान, कळवण शहरात विनामास्क फिरणार्यांवर नगरपंचायत प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली असून कारवाई केलेल्या नागरिकांकडून दंड आकारून त्यांना मास्क देण्यात आले.