नाशिक-पुणे रेल्वे मार्ग; शेतकर्‍यांचा विरोध मावळला

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग; शेतकर्‍यांचा विरोध मावळला

बहूचर्चीत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला चार गावांतील शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर खासदार हेमंत गोडसे व भाजपचे सुनील आडके यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर गुरुवारी (दि.१०) नानेगावात जमीन मोजणीला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला. यावेळी महारेलचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, नानेगाव येथे रेल्वे स्थानकाच्या मुख्य मागणीबाबत महारेल सकारात्मक असून शक्यता पडताळून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक-पुणे रेल्वे मार्गात येणार्‍या मागण्या व सूचना ऐकून घेण्यासाठी बुधवारी (दि.९) झालेल्या बैठकीत नानेगाव, संसरीसह बेलतगव्हाण व विहितगावच्या शेतकर्‍यांनी विविध मागण्या करत विरोध दर्शविला होता. गुरुवारी (दि. १०) सकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी शेतकर्‍यांची समजूत काढतांना सांगितले की, नाशिक-पुणे रेल्वे मार्गात जाणार्‍या जमिनीचे क्षेत्र, घरे, पिके व इतर गोष्टींच्या नोंदी होऊन ते निश्चित केले जाणार आहेत, विकास कामांना अडथळा करणे योग्य नाही, त्याच बरोबर शेतकरी व बाधितांचे थोडेही नुकसान न होता योग्य मोबदला मिळणार आहे. तर आडके यांनी शेतकरी महारेल प्रकल्पात बाधित होणार्‍या शेतकर्‍यांची बैठक घेऊन रेल्वे स्थानकाबाबत चर्चा केली. यावेळी खा. हेमंत गोडसे, सुनील आडके, कचरु आडके, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक आडके, भगवान आडके, ज्ञानेश्वर काळे, कैलास आडके, विजय आडके, संजय आडके, संदीप आडके, सचिन आडके, शरद रोकडे, निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, नानेगावचे शेतकरी सहकार्य करत आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर विचार विनिमय सुरु आहे. रेल्वे स्थानकाबाबत महारेल प्रशासन सकारात्मक असून शक्यता पडताळली जात असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

गावात एकूण २१.५ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. १२२ खातेदार आहेत, त्यात आणेवारीप्रमाणे इतर शेतकरी संख्या वाढणार आहे. विशेष म्हणजे, या गावातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असल्याने यातून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. त्यापैकी एकूण द्राक्षबागांपैकी ३० टक्के द्राक्ष बाग बाधित होणार असल्याने त्या प्रमाणात मोबदला मिळावा.
-ज्ञानेश्वर शिंदे, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक

 

रेल्वे स्थानकाच्या मागणीवर नानेगावचे ग्रामस्थ ठाम आहेत. यासाठी मूळ रेल्वे ट्रॅकला ३५ मीटर रुंदीचे आरक्षण आहे. परंतू केवळ रेल्वे ट्रॅकसाठी जागा न देता रेल्वे स्टेशनसाठी लागणारी दोन किलोमीटर लांबी व दोन्ही बाजूने अतिरीक्त जागा देण्याची गावकर्‍यांनी तयारी दर्शवली आहे. रेल्वेस्थानक प्रमुख मागणी आहे, ते झाल्यास परिसरात मोठा रोजगार उपलब्ध होईल.
– सुनील आडके, भाजप पदाधिकारी

First Published on: June 11, 2021 7:52 PM
Exit mobile version