वृत्तपत्र, मराठी पत्रकारितेमुळे विश्वासार्हता टिकून : जिल्हाधिकारी

वृत्तपत्र, मराठी पत्रकारितेमुळे विश्वासार्हता टिकून : जिल्हाधिकारी

नाशिक : सध्या डिजिटल माध्यमांचे युग असले तरी या माध्यमांच्या भाऊगर्दीत खरे व खोटेपणातील सीमारेषा अस्पष्ट होत आहे. अशा काळात वृत्तपत्र माध्यमांनी व मराठी पत्रकारितेने माध्यमांची विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. पुढील काळात ही विश्वासार्हता आणखी जोपासली जावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.

मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न नाशिक शहर पत्रकार संघातर्फे गुरुवारी (दि.६) मराठी पत्रकार दिन सोहळा मविप्रच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, पुढारीचे निवासी संपादक प्रताप जाधव, पुण्यनगरीचे निवासी संपादक किरण लोखंडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘आपलं महानगर’चे सुशांत किर्वे यांच्यासह विविध वृत्तपत्रांतील प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आयुक्त कैलास जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी पत्रकारितेने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बाणेदारपणा दाखवत विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. पुस्तक वाचन व वर्तमानपत्र वाचनातून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यात मोठे योगदान आहे. सध्या डिजिटल माध्यम व सोशल मीडियाचे दिवस असले, तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता ही खरी ताकद असल्याने वृत्तपत्र माध्यमाला चांगले दिवस आले आहेत, असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी मराठी पत्रकारितेचा स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळातील स्थित्यंतरांचा आढावा घेतला. सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी प्रास्ताविक करताना पत्रकारितेतील अपेक्षित बदलांवर भाष्य केले. अभिनेता किरण भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर ज्ञानेश्वर वाघ यांनी आभार मानले.

First Published on: January 7, 2022 8:35 AM
Exit mobile version