नाशिकमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी, मास्क न वापरल्यास होणार कारवाई

नाशिकमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी, मास्क न वापरल्यास होणार कारवाई

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याने चिंताही वाढवली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहीती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा, ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही कोरोना लस घेतली नाही अशा कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे निर्देश यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. तसेच लग्नसमारंभात आणि सार्वजनिक कार्यक्रमात फेस मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, कोरोनाचा धोका वाढतोय त्यामुळे नियमांचे पालन करा. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फेस मास्कचा वापर न केल्यास तसेच जास्त गर्दी झाल्यास लग्न समारंभ, हॉटेल, मंगल कार्यालयांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्क न घातल्यास १ हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

तसेच छगन भुजबळ पुढे म्हणाले की, पोलिसांना आता लग्न सोहळ्यावर धाडी टाकण्यास सांगितले आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी मास्क घातलेला नसेल अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. लग्न सोहळ्यात १०० लोक आले तरी कोरोना नियमांचे पालन करा मास्क वापरा असे मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे. नागरिक मास्क वापरत नसल्यामुळे नाईलाजाने पोलिसांना मंगल कार्यालयात पाठवावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. ६९ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार होते यामधील ४० हजार कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत लस घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांबाबत अद्याप काही निर्णय घेण्या आला नाही. परंतु आठवडाभराचा आढावा घेण्यात येईल यानंतर शाळांबाबत निर्णय घेण्यात येतील.

First Published on: February 21, 2021 6:21 PM
Exit mobile version