टँकरमुक्तीसाठी सरसावले अनिवासी भारतीय

टँकरमुक्तीसाठी सरसावले अनिवासी भारतीय

अ‍ॅडव्हान्स एन्झाइमचे अध्यक्ष वसंत राठी, डीजीएम किशोर राठी, सीएसआर प्रमुख मुकुंद काबरा यांच्या हस्ते धनादेश स्विकारताना प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव.

शेतीसाठी पूरक उत्पादनांचा अमेरिकेत उद्योग उभारणार्‍या वसंत राठी यांनी सोशल नेटवर्किंग फोरमच्या टँकरमुक्ती अभियानासाठी पावणेचार लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त कोळुष्टी गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.

मूळचे येवला येथील राठी कुटुंबातील वसंत आणि किशोर राठी यांचा अ‍ॅडव्हान्स एन्झाइम्स या नावाने शेतीला पूरक एन्झाइम्स बनवण्याचा उद्योग आहे. या उद्योगाचे जाळे युरोप अमेरिकेत उभारण्यासाठी वसंत राठी गेली अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत, तर किशोर राठी स्थानिक कामकाज बघतात. यापूर्वी सक्रिय योगदान दिलेल्या अमेरिकेतील अनिवासी भारतीयांकडून त्यांना आपल्या जन्मस्थळी आदिवासी गावांना टँकरमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने उभारलेल्या कार्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतात आल्यावर त्यांनी फोरमच्या कार्याची सविस्तर माहिती घेतली आणि त्वरित एका गावासाठी लागणारा संपूर्ण निधी देण्याची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे सोशल फोरमच्या टीमने पेठ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून ‘कोळुष्टी’ हे गाव निश्चित केले आणि या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना आखल्या.

जबाबदार्‍या निश्चित करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनाही त्यांचा सहभाग देण्यासाठी प्रोत्साहित केले. कामासाठी लागणार्‍या उर्वरित निधीचा राठी यांना प्रस्ताव देण्यात आला. अवघ्या तीन आठवड्यांत अ‍ॅडव्हान्स एन्झाइम कंपनीने निधी मंजूर करून ३ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश फोरमला दिला. या निधीतून एक महिन्यातच कोळुष्टीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे फोरमचे सदस्य डॉ. पंकज भदाणे यांनी सांगितले. प्रकल्प पूर्णत्वाची जबाबदारी इंजि. प्रशांत बच्छाव घेणार आहेत तर भविष्यात या योजनेच्या वापरात काहीही अडचण येणार नाही याची जबाबदारी संदीप बत्तासे आणि रामदास शिंदे यांनी घेतली आहे. या दातृत्वाबद्दल राठी कुटुंबीय आणि अ‍ॅडव्हान्स एन्झाइम्स कंपनीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

काम बघून प्रभावित

अमेरिकेत योगेश कासट यांच्याकडून फोरमच्या कार्याची माहिती मिळाली. मध्यंतरात भारतात आलो असताना प्रमोद गायकवाड यांना भेटलो. सोशल मीडियाचा योग्य वापर करून चालू असलेले हे काम बघून मी अतिशय प्रभावित झालो आणि एका गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी फोरमला आर्थिक सहकार्य केले. – वसंत राठी, अध्यक्ष, अड्व्हान्स एन्झाइम्स

पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो

नाशिक जिल्ह्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी परदेशातील बांधव पुढे येत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. नाशिकच्या स्थानिक कंपन्यांनीही आपल्या सीएसआर योजनांतून फोरमला सहकार्य केल्यास अनेक गावांना पिण्याचे पाणी देता येईल. यातून अनेक गावांचा अत्यंत महत्त्वाचा असा पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो. – प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम

First Published on: March 17, 2019 10:46 AM
Exit mobile version