तुरूंगवारी करणार्‍यांना मातीत गाडा

तुरूंगवारी करणार्‍यांना मातीत गाडा

भुजबळांचे चरित्र आपणा सर्वांसमोर आहे. पाच वर्षात त्यांनी काय कारनामे केले हेही आपल्यासमोर आले त्यामुळे आपल्याला जेलवारी करणारे खासदार हवे का असा सवाल करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांवर टिकास्त्र सोडले.

शिवसेना भाजप महायुतीच्यावतीने नाशिक येथे अनंत कान्हेरे मैदानावर आयोजीत विजय संकल्प सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज, शिवसेना नेते संजय राउत उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर टिकास्त्र सोडले. एकिकडे हेमंत गोडसें सारखे उमेदवार आपल्यासमोर आहेत तर दुसरीकडे समीर भुजबळ उभे आहेत. भुजबळांबददल मी अधिक काय बोलणार त्यांचे चरित्र आपणासमोर आहेच. त्यांचे कारनामे, त्यांची जेलयात्रा हे नाशिककर विसरू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्याला जेलवारी करणारे खासदार हवे की विकास कामे करणारे हे आपणच ठरवा असे सांगत त्यांनी गोडसे यांच्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक करत नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी हेमंत गोडसेंच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन केले.

शिवसेना नेते संजय राउत यांनीही महाजन यांचीच रि ओढत भुजबळांवर निशाणा साधला. आपण गुंड पुंडांना लोकसभेत पाठवणार का असा सवाल करत तुरूंगवारी करणार्‍यांना धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले. अयोध्येत राममंदिर पुन्हा बांधायचं असेल तर आपल्याला नरेंद्र मोदींचे हात बळकट करावे लागतील. मोदी पंतप्रधान झाले तर अयोध्येतच काय तर पाकिस्तानच्या लाहोरमध्येही आपण राममंदिर बांधू. मोदी पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानचेे नावही जगाच्या नकाशावर राहणार नाही असे सांगत दिल्लीत भगवा फडकवण्यासाठी शिवसेना, भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी आपली ताकद उभी कराव असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हयातील भाजप, शिवसेनेचे सर्व आमदार, तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: April 25, 2019 12:36 AM
Exit mobile version