तहसीलदार राजश्री अहिरराव यांचा कार्यभार काढला; कारण राजकारण?

तहसीलदार राजश्री अहिरराव यांचा कार्यभार काढला; कारण राजकारण?

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्याकडील कारभार जिल्हाधिकार्‍यांनी तडकाफडकी काढून घेत तहसीलदार (चिटणीस) राजेंद्र नजन आणि तहसीलदार (कुळकायदा) पल्लवी जगताप यांच्याकडे सोपविला. राजकीय सुडातून ही कारवाई झाल्याची चर्चा असून, यामागील मूळ कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

डॉ. राजश्री अहिरराव यांच्याकडे सामान्य शाखा व लेखा शाखा या दोन महत्वाच्या शाखांच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे. आता ती अन्य तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. यापूर्वी म्हणजेच २०१८ मध्येदेखील अहिरराव यांची बदली झाल्याने त्यांची बदली रद्द होण्यासाठी विविध संघटना सरसावल्या होत्या. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांची कायमच नाराजी राहिली आहे. विद्यमान जिल्हाधिकार्‍यांनीही अहिरराव यांना सुटीवरून परतल्यानंतर कामावर रूजू करून घेण्यास नकार दिला होता. यामागे एका आमदाराची तक्रार असल्याची चर्चा होती. जिल्हाधिकारी रूजू करून घेत नसल्याने हे प्रकरण थेट उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांपर्यंत पोहोचले होते.

देवळाली विधानसभा मतदारसंघातून डॉ. राजश्री अहिरराव या २०२४ ची पंचवार्षिक निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तालुक्याच्या तहसीलदार म्हणून कार्यरत असताना राजश्री अहिरराव यांच्या कामकाजाची सर्वाधिक चर्चा झाली. विशेषतः देवळाली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांची रेशनकार्ड काढून देण्यास मदत केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे भविष्यात अहिरराव या देवळाली मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतात, असाही कयास असल्याने राजकीय कुरघोडीतून ही कारवाई करण्यात आली की काय अशीही चर्चा रंगू लागली आहे.

First Published on: March 11, 2023 12:46 PM
Exit mobile version