विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे आव्हान

विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजप्रवाहात आणण्याचे आव्हान

साईप्रसाद पाटील । नाशिक

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नसताना पोलिसांबरोबरच समाजातील प्रत्येक घटकालाच आता सजग होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. विशेष म्हणजे, विधीसंघर्षग्रस्त बालकांचे कायद्याविरुद्ध वर्तन रोखण्याचे आजघडीला मोठे आव्हान उभे राहिले असल्याने पालकांसह शिक्षक, नातेवाईक, पोलीस व समाजातील सर्वच घटनांना अधिक जबाबदारीने वर्तन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नाशकात गेल्या काही कायद्याविरोधातील घटनांतील विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश पाहता त्यांच्यासाठी आता विशेष समुपदेशन केंद्र, अभ्यासपूर्ण मनोरंजन केंद्र उभे राहणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ज्यासाठी सामाजिक संस्था, विशेष अधिकारी, दातृत्वशील व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास नाशकातून विधीसंघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकेल.

पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, अंबडमधील गेल्या काही घटनांवरून विधीसंघर्षग्रस्त बालकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. अशा स्थितीत पालकांची तसेच पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. मात्र, याही पलिकडे जाऊन अशा बालकांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच घटकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. अशा बालकांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, त्यांच्या संपर्कात राहणे, कायद्याची, आरोग्याची, योग्य वर्तणुकीची समज वेळोवेळी दिली जावी, सोशल मीडिया-मोबाईल- टीव्हीपासून बालकांना वेळीच रोखल्यास त्यांना आभासी दुनियेपासून दूर ठेवता येईल, जेणेकरून आपसूकच विधीसंघर्षीत बालकांचे प्रमाण कमी होऊन कायदेविरोधातील घटनांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.

पंचवटी, नाशिकरोड परिसरातील तिघा विधीसंघर्षीत बालकांनी शस्त्र बाळगळ्याची घटना नुकतीच समोर आली होती. अशा बालकांकडून रागासंतापात, अनावधानाने अशी चूक केली गेली असली तरी योग्यवेळी योग्य पावले उचलली गेल्यास त्यांना रोखणे शक्य होते, हे विसरून चालणार नाही. पोलिसांनी या बालकांना ताब्यात घेत, त्यांच्या आई, मावशीसमक्ष समज दिली. यानंतर या बालकांना बालसुधार गृहातही समुपदेशित करण्यात आले. अंबडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका विधीसंघर्षित बालकाकडे अत्यंत घातक शस्त्रे आढळली. ही शस्त्रे त्याने स्वत:हून घेतली नसली, तरी एका सराईताने ती त्याच्याकडे लपवायला दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका गुन्हेगारामुळे या विधीसंघर्षित बालकालाही शिकण्याच्या वयात पोलीस दप्तरी कारवाईला सामोरे जावे लागले, हे दुर्दैवच.

अशा घटना यापूर्वीही घडल्या असल्याने त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. वाईट संगत ही नेहमी वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करते, याचा प्रत्यय आजवर अनेकदा आलाय, त्यामुळे पालकांनीही वेळोवेळी आपल्या पाल्याचे निरीक्षण करून त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. शाळकरी, तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही वर्तणुकीकडे पालकांनी लक्ष ठेवून शिक्षकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. जेणेकरून मुलांच्या अभ्यास, वर्तणूक आणि मित्रांबाबत त्यांना वेळोवेळी माहिती मिळू शकेल, असा सल्ला मानसतज्ज्ञांसह पोलीस अधिकारी, बालसुधारगृहातील अधिकारी व तज्ज्ञ समुपदेशक देतात. त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

या उपाययोजना शक्य

आभासी दुनियेपासून मुलांना ठेवा दूर

सध्याच्या परिस्थितीत मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उर्मटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात पालकांची भूमिका पोलिसांपेक्षा महत्त्वाची ठरेल, असे मत अनेकांकडून व्यक्त केले जातेय. कौटुंबिक स्तरावर प्रयत्न करुनही पाल्याच्या वागण्यात सुधारणा नसेल, तर समुपदेशनाचा पर्याय योग्य ठरेल. मुलांशी संवाद हे सर्वाधिक महत्त्वाचे औषध ठरते. मुलांच्या बदलत्या सवयींवर पालकांबरोबरच शिक्षकांनीही लक्ष ठेवणे, त्याची कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे. सोशल मीडिया, टीव्ही, मोबाईलचा अतिरेक नको, याचेही भान ठेवले गेल्यास मुले वाईट संगतींपासून आपसूकच दुरावतील. मुलांना चित्रपट, सिरीजमधील आभासी दुनियेपासून दूर ठेवले पाहिजे. या दुनियेविषयी त्यांना कल्पना देत राहिले पाहिजे. मुलांना अध्यात्म, बलोपासना, कलोपासनेची शिकवण द्यावी, जेणेकरून ते शिस्तप्रिय बनतील.

विधीसंघर्षग्रस्त बालके वाढण्याची कारणे

First Published on: June 18, 2022 1:54 PM
Exit mobile version