सत्तास्थापनेनंतर महाआघाडीचा जल्लोष

सत्तास्थापनेनंतर महाआघाडीचा जल्लोष

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडताच नाशिकमध्ये महाआघाडीच्या वतीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या वतीने शहरातील चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर पेढे वाटप करण्यात आले.

राज्यात अखेर महाविकास आघाडी स्थापन करण्यात येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडत असताना नाशिकमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईनाका येथील पक्ष कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. ‘महाआघाडीचा विजय असो’, ‘शरद पवार आगे बढो, भुजबळ साहेब आगे बढो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तर पंचवटी कारंजा येथे शिवसेनेच्या वतीने ढोल-ताश्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ‘आवाज कुणाचा& शिवसेनेचा’, ‘आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महाआघाडीचा विजय असो’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

ढोल-ताशे आणि आतषबाजीत हातात भगवे झेंडे घेतलेल्या महाआघाडीच्या नेत्यांनी नृत्य करत आनंद साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिणीस नाना महाले, शहर सरचिटणीस संजय खैरनार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, मुजाहीद शेख, शंकर मोकळ, शंकर पिंगळे, चिन्मय गाढे, जीवन रायते, बाळासाहेब गिते, धनंजय निकाळे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: November 29, 2019 1:33 AM
Exit mobile version