त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत सावरपाडा येथील पाड्यावरील तास नदीवर पूल नसल्याने आदिवासी महिलांना ३० फूट खोल तास बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पिण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. ग्रामस्थांसहित महिला वर्ग, विद्यार्थ्यांना नदीवरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असल्याची बातमी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या घटनेची दखल घेत आता तास नदीवर लोखंडी पूल बांधला गेला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो ही बातमी वाचून अस्वस्थ झालो. येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी साकव बांधण्याचे काम सुरू झाले आहे. २ दिवसात हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले.