पंचवटीतील दोन अपघातांत दोन ठार

पंचवटीतील दोन अपघातांत दोन ठार

पंचवटीतील मुंबई-आग्रा आणि नाशिक-औरंगाबाद महामार्गांवरील अपघातांत दुचाकीवरील दोन जण ठार झाले. त्यातील एका घटनेत राँग साईड मोटरसायकलने दुसऱ्या मोटरसायकलला धडक दिली, तर दुसऱ्या घटनेत भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

पंचवटीतील हॉटेल जत्रानजीक राधाकृष्ण लॉन्ससमोरून एक वृद्ध दांपत्य मोटरसायकलवरुन जात असताना, समोरून राँग साईडने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात बाळासाहेब नारायण पाटील (६२, रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, तपोवन) यांचा मृत्यू झाला. उदय गांगुर्डे हा युवक विरुद्ध दिशेने भरधाव वेगात दुचाकीने (एमएच- १८, बीएन- ८६३९) जात होता. गाडीवर नियंत्रण मिळवता न न आल्याने त्याने पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. जयश्री बाळासाहेब पाटील यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिसांनी उदय गांगुर्डेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरा अपघात औरंगाबाद रोडवरील अरिहंत मार्बल दुकानासमोर झाला. संतोष शिवाजी काठे (४०, रा. कर्मयोगी अपार्टमेंट, औरंगाबाद रोड, पंचवटी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संतोष काठे हे दुचाकीने जात असताना भरधाव आलेल्या कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. याप्रकरणी जयश्री संतोष काठे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाफुले करत आहेत.

First Published on: April 28, 2019 5:24 PM
Exit mobile version