मविआला कमकुवत करून नेत्यांना भाजपमध्ये आकर्षित करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

मविआला कमकुवत करून नेत्यांना भाजपमध्ये आकर्षित करण्यासाठी एजन्सीचा गैरवापर; राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप

मुंबई : अंमलबजावणी संचालयाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर, कारखान्यावर आणि नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केली, हसन मुश्रीफांसंबंधीत राज्यातील जवळपास 7 ठिकाणी ही छापेमारी झाली. मुश्रीफांविरोधातील या छापेमारीमुळे आता कोल्हापूरमधील त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर विरोधी पक्षांनी देखील या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सातत्याने केंद्रसरकारचा वापर करत आहे. महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी आणि नेत्यांना भाजपमध्ये आकर्षित करण्यासाठी एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकते याबाबत महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

भाजपचे काही नेते भविष्यात ईडीच्या छाप्यांबाबत माध्यमातून वक्तव्य करतात आणि तसेच घडते हे विडंबनात्मक नाही का? तसेच शिंदे – फडणवीस सरकारच्या पाठीशी असलेल्या आमदार – खासदारांवरील सर्व आरोपांचे काय झाले? भाजपने या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ईडी, आयटीने तपास बंद करून त्यांना निर्दोष सोडले आहे का? असे अनेक सवाल महेश तपासे यांनी भाजपला केले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केले होते. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोपही सोमय्यांनी केला. याचप्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


 

First Published on: January 11, 2023 3:28 PM
Exit mobile version