ओबीसी समाजावर घोर अन्याय; नगरपालिका निवडणुकांना राष्ट्रवादीचा विरोध

ओबीसी समाजावर घोर अन्याय; नगरपालिका निवडणुकांना राष्ट्रवादीचा विरोध

मुंबई : राज्यामध्ये 18 ऑगस्टला 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशा भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी महाविकास आघाडीकडून सर्वोतोपरीने प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पहिल्या दिवसापासून यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा करून अहवालही तयार केला आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल व ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल, याबाबत पूर्ण विश्वास व्यक्त करतानाच ही लढाई अंतिम टप्प्यात असून निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये, अशी विनंतीही त्यांनी आयोगाला केली आहे.

निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपाची मागणी
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. परंतु या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात, अशी आग्रही भूमिका ओबीसी नेत्यांची आहे. त्यामुळेच या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भाजपाने केली आहे. यासंदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग आयुक्त यू पी एस मदान यांची भेट घेणार असल्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

First Published on: July 9, 2022 1:29 PM
Exit mobile version