नेटवर्क इलो रे… सिंधुदुर्गात नवे १८४ मोबाईल टॉवर

नेटवर्क इलो रे… सिंधुदुर्गात नवे १८४ मोबाईल टॉवर

प्रातिनिधिक छायाचित्र

सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गाने नटलेला. झाडं-झुडपं आणि वळणावळणाचा. जिल्ह्यात आतापर्यंत अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोकण रेल्वेपासून मालवणात स्कुबा डायविंगपर्यंत अनेक बदल जिल्ह्याने पाहिले. मात्र ४जी नेटवर्कच्या जमान्यात जिल्ह्यात अजूनही २जीचे नेटवर्क मिळणे दुरापास्तच होते. मुंबई – गोवा महामार्गाचा भाग सोडला तर आतल्या बाजुला नेटवर्कची अजूनही बोंब आहे. त्यातही कहर म्हणजे सावंतवाडी तालुका. सावंतवाडी तालुक्यातील काही गावांत तर अजून बीएसएनएलचे नेटवर्कही उपलब्ध नाही.

सुरेश प्रभूंच्या प्रयत्नांना यश

नेटवर्कच्या बाबतीत अशी अवस्था असतानाच आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट सुविधेत वाढ होणार असून या जिल्ह्यात लवकरच १८४ अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी केंद्रीय वाणिज्य, व्यापार व नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल व ब्रॉडबँड नेटवर्कचे जाळे विस्तारण्याच्या योजनेअंतर्गत टू-जी क्षमतेचे ७४ व थ्री-जी क्षमतेचे ११० मोबाईल टॉवर नजिकच्या काळात उभारण्याच्या प्रस्तावास मंजूरी प्रदान करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल व ब्रॉडबँड सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी राष्ट्रीय ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत सिन्हा यांना प्रभू यांनी पत्र लिहीले होते.

पर्यटन वाढीसाठी नेटवर्क गरजेचे

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये १८८ टू-जी व ६८ थ्री-जी मोबाईल टॉवर्स आहेत. मात्र, या भागातील रम्य समुद्रकिनारे व इतर परिसरातही पर्यटकांची गर्दी कायम असते. त्यामुळे या जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात मोबाईल सुविधांमध्ये सुधारणा आवश्‍यक असल्याची गरज केंद्रीय मंत्री प्रभू यांनी पत्राद्वारे व्यक्त केली होती. सिन्हा यांनी आपल्या पत्रोत्तरात मोबाईल टॉवर्सची संख्या आणखी १८४ ने वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे कळविले आहे.

First Published on: June 27, 2018 8:51 PM
Exit mobile version