मराठी साहित्य संमेलनामध्ये आमंंत्रणावरून रंगलेल्या वादावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता सरकारला घरचा आहेर दिला आहे. राजकारणी लोकांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये अशा शब्दात नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राजकारणाचा अर्थ राजकारण, समाजकारण, अर्थकारण. पण, दुर्दैवाने आता सत्ताकारणाभोवतीच राजकारण फिरतंय. राजकारणाची सीमित मर्यादा आहे. म्हणून राजकारणी लोकांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात नितीन गडकरी बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. पण, ऐनवेळी हे आमंत्रण रद्द करण्यात आलं. त्यामुळे सरकारवर जोरदार टीका देखील झाली. या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाणे टाळले. पण, केंद्रीय नितीन गडकरींनी मात्र साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवश हजेरी लावली. यावेळी गडकरी काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष होतं. यावेळी गडकरींनी सरकारलाच घरचा आहेर दिला.