५ जूनला नाशकात कांदा परिषदेचे आयोजन

५ जूनला नाशकात कांदा परिषदेचे आयोजन

नाशिक : पुणतांबा येथून १ जून रोजी शेतकर्‍यांनी सरकारविरोधात एल्गार आंदोलन पुकारले असताना आता कांदा उत्पादक शेतकरीही आक्रमक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला खूप कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशाच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ५ जून रोजी नाशिकमध्ये कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले.

निफाड तालुक्यातील रूई या गावात ही कांदा परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेला माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. शेतकर्‍यांच्या डोळ्यातल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आघाडी सरकारला द्यावाच लागेल, त्यामुळे आम्ही जागर शेतकर्‍याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा करणार असल्याचे खोत म्हणाले. सध्या कांद्याचे दर हे 1 रुपये ते 3 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आहे. काही ठिकाणी कांदा उत्पादकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी कांदा जनावरांना  खाऊ घालत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचताना दिसत नाही. कांद्याच्या दराबाबत सहकार आणि पणन मंत्र्यांनी बैठक घेणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. कांद्याला अनुदान देणे गरजेचे होते, देवेंद्र फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिकिलो दोन रुपये अनुदान दिले होते. गुजरात सरकारने कांदा उत्पादकांना तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांद्याला प्रतिकिलोला पाच रुपयांचे अनुदान द्यावे, अशी सेतकर्‍यांची मागणी आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे खोत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निदान ऑनलाईन बैठक घ्यावी

जून महिन्यात नवीन कांद्याची लागवड होणार आहे. अशा वेळी कांद्याला दर नसल्यामुळे शेतकर्‍यांना बँकेकडून कर्ज मिळणार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सावकरांच्या दारी जातील. सावकरांच्या गळफासात शेतकरी अडकले जातील, असे खोत यावेळी म्हणाले. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडंस गावाकडे बघावे, शेतकर्‍यांकडे बघावे, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी ऑनलाईन कांदा उत्पादकांसाठी एखादी बैठक घ्यावी. कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी मदत करावी असे ते म्हणाले. सरकार डोळेझाक करत असेल तर आम्ही याविरोधात आवाज उठवू असा इशारा खोत यांनी यावेळी दिला.

First Published on: June 1, 2022 12:28 PM
Exit mobile version