मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी अनिश्चित काळासाठी वाढविली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. क्षुल्लक राजकीय स्वार्थापायी भाजपाने हा निर्णय घेतला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (एनसीपी – एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा – Congress on PM Modi : …आणि मोदींनी काँग्रेसलाच भ्रष्टाचारमुक्त केलं; काय म्हणाले जयराम रमेश
देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने 31 मार्च 2024पर्यंत कांदा निर्यातबंदी लागू केली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली असून याबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गेल्या महिन्यात दिली होती. पण नंतर असा कोणाताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. तर, आता 22 मार्च रोजी केंद्र सरकारने नव्याने आदेश काढून ही बंदी अनिश्चित काळासाठी वाढविली आहे.
यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केंद्रातील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने अन्यायकारक रितीने कांद्याची निर्यातबंदी कायम केली आणि लाखो कांदा उत्पादकांच्या तोंडचा सुखाचा घास हिरावून घेतला. देशात भरपूर कांदा शिल्लक असून देखील केवळ क्षुल्लक राजकीय स्वार्थापायी भाजपाने हा निर्णय घेतला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Chitra Wagh : महिलांच्या आत्मसन्मानावर काँग्रेसनेच सपासप वार केलेत, चित्रा वाघांची टीका
ग्राहकहित सांभाळताना उत्पादकांना उपाशी मारणे हे अपयशी कृषी आणि ग्राहक धोरणाचे द्योतक आहे. एनसीपी – एसपीचे प्रमुख शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना सर्व प्रकारचा दबाव झुगारून देत शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका घेतली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
रोहित पवारांकडून संताप
एनसीपी – एसपीचे आमदार रोहित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी ट्वीट करत याबाबत संताप व्यक्त केला होता. निर्यातबंदीमुळे आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल पाच हजार कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. लवकरच ही निर्यातबंदी संपुष्टात येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना शेतकरीविरोधी दुष्ट केंद्र सरकारने निर्यादबंदीचा कालावधी आणखी वाढवला, हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
जागावाटपाच्या चर्चेसाठी रोज दिल्लीवाऱ्या करणारे आणि कथित ‘विकासा’साठी सत्तेत गेलेले नेते कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करून महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवतील का? की शेतकऱ्यांचा विकास हा या नेत्यांच्या दृष्टीने विकास नाही? असे त्यांनी थेट अजित पवार यांचे नाव न घेता सुनावले होते.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकीच्या रिंगणात भाजपाची ‘स्टार पॉवर’, सेलिब्रिटिंना तिकिटे